
अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥
विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।
दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥
तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें ।
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।
अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥
जळत ह्रदय माझें जन्म कोट्यानुकोटी ।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।
षड्रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥
सबळ जनक माझा राम लावण्यकोटी ।
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥
दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं ।
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥
जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥
तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।
रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती ।
विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥
सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे ।
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं ।
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥
सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें ।
भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले ॥
भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना ।
परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना ॥ १३ ॥
उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं ।
सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥
घंडिघडि मन आतां रामरूपीं भरावें ।
रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥
Today is Magh Krishna Navmi, Samarth Ramdas left this world for to meet his spiritual mentor.
Maharashtra and in all extent, India, too will remain indebted forever to this great teacher. He is the one who started establising Hanuman temples (matths) all over the Maval region and training kids from their childhood for warfare and also to spread the Vedic religion and culture. The temples became a ready place for practising and training of the Mavlas who were ready to help Chhatrapati Shivaji Maharaj in fulfilling his dream for Swaraj.
He is considered to be the spiritual guide to Chhatrapati Shivaji Maharaj and later to his son and descendant Chhatrapati Sambhaji Maharaj.
His last resting place is Sajjangad. A fort built by Chhatrapati Sambhaji Maharaj. Though initially reluctant, Ramdas Swami finally accepted to stay there and passed his last few years on the fort. Even today the fort houses the “samadhi” of this great teacher.
On this day we bow down to this most pious soul and pray to Him to grant us the understanding of the word Hindavi Swaraj.
🙏Jay Jay Raghuveer Samarth🙏